महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सौर कृषीपंप हा सुर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासुन चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यत: सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे.

सौर कृषीपंप हा शेततळे, विहिर, बोअरवेल इ. शाश्वत पाण्याचा स्त्रोत मधुन पाण्याचा उपसा करण्याचे काम करतो. उपसा केलेले पाणी हे पाईपद्वारे शेतातील पिकांना देण्यास मदत होते.

सौर कृषीपंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सुर्याच्या किरणांपासून काम करतो. जेव्हा सुर्यकिरणे सोलर पॅनल्सवर पडतील तेव्हा डीसी उर्जा निर्माण होऊन सौर कृषीपंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. कृषीपंप सौर ऊर्जेवर चालणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाकरीता योग्य आहे.

  • सौर कृषीपंप चालविण्यासाठी कोणत्याही इंधन किंवा पारंपारिक विजेची आवश्यकता नाही. एकदा स्थापित केल्यावर सौर कृषीपंप वीज किंवा इंधनाचा आवर्ती खर्च करत नाही.
  • वीज कपात, कमी दाबाचा विजपुरवठा, सिंगल फेज समस्या किंवा मोटर जळाल्यामुळे प्रभावित होत नाही.
  • सौर कृषीपंप दुर्गम भागात स्थापित केले जाऊ शकतात जेथे विज खांब टाकणे कठीण आहे.
  • डीझल पंपाच्या तुलनेत सौर कृषीपंपाचा देखभाल खर्च फारच कमी असून हा पंप दीर्घकाळ टिकतो.
  • सौर कृषीपंपाला लुब्रिकेंटची/तेलाची आवश्यकता नसते आणि त्यामुळे पाणी, माती दूषित होण्याची शक्यता नसते.
  • सौर कृषीपंपाचे संचालन अतिशय सोपे असून अत्यंत फायदेशीर आहे.
  • सौर कृषीपंपामुळे आपल्याला दिवसा पाण्याचा उपसा करणे शक्य होते.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत.

सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महारष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्यपरिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक - ब योजने अंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे. राज्यात दि. ०६.०९.२०२४ रोजी पर्यंत 2,63,156 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषीपंपा बाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपारिक कृषीपंपाकरीता वीजपुरवठा देण्यात आला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित असलेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल.

या योजने अंतर्गत नवीन सौर कृषीपंप मिळण्याकरीता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. वेबपोर्टलवरुन किंवा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या link वर जाऊन, अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करवयाचे आहे.

शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जाल्स्त्रोताची नोंद आवश्यक आहे), आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरीता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.

लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच विविध टप्प्यावर अर्जाची सद्य:स्थितीची माहिती अर्जदारास त्याचे मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. याव्यतिरिक्त, अर्जदारास वेबपोर्टलवर जावून लाभार्थी क्रमांकच्या आधारे अर्जाची सध्यस्थिती बघता येईल.

सौर कृषीपंप पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्यासाठी जिथे सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पूर्णपणे पडतील, कुठल्याही प्रकारची सावली अथवा आडोसा त्यावर येणार नाही तसेच पॅनलवर धूळ, घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सोलर पॅनल सूर्यकिरणांच्या दिशेने फिरण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसविण्यात यावा तसेच जमिनीचा भूभाग हा समपातळीवर असावा. सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ व अशा ठिकाणी लावावा जेणेकरून तो सहज स्वच्छ करता येईल. सोलर पंप हा सोलर पॅनेलच्या जवळच असला पाहिजे. परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करावयाचे आहे त्याच क्षेत्रात असला पाहिजे.

एकदा स्थापित केलेला सौर कृषीपंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही. शासन शुद्धीपत्रक दि. ०५.०३.२०२४ अन्वये, सौर कृषीपंप आस्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषीपंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील. लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषीपंपांची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांचेविरुध्द महावितरण कंपनी यांचेद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल.

सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के रक्कम व अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 5 टक्के एवढी रक्कम भारवी लागेल.

या योजनेअंतर्गत २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमतेचा, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.

  1. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
  2. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, कमी वीजेच्या दाबामुळे किंवा सिंगल फेजमुळे सिंचनावर कोणताही परिणाम होणार नाही.
  3. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीज बिलाचा किंवा डिझेलचा खर्च नाही.
  4. कमीतकमी रखरखावची आवश्यकता.
  5. विजेची तार तुटून किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा धोका नाही.
  6. पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत.

सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवले असून क्वचितच वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान होते. एखाद्याच दुर्मिळवेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनेलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र (Lighting Arrestor) बसविण्यात येणार आहे.

सदर सौर कृषीपंपाची देखभाल व दुरूस्तीचा कालावधी 5 वर्ष राहणार आहे. या कालावधीत सौर कृषीपंप नादुरूस्त झाल्यास दुरूस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. शेतकऱ्यांने सौर कृषीपंप नादुरूस्त झाल्यास महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला तत्काळ कळविणे आवश्यक आहे.

सौर कृषीपंपाला अत्यंत कमी देखभाल करण्याची आवश्यकता असते. साधारणत: सौर पॅनल वर कचरा किंवा धुळ बसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. सौर पॅनलवरील धुळ वेळोवेळी व ओल्या कापडाद्वारे स्वच्छ केल्याने कार्यक्षमता योग्य राहते.

सौर कृषीपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्वरित त्याची तक्रार नजिकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे (FIR) दाखल करावी. तसेच त्याची माहिती महावितरण कार्यालयास व संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला देण्यात यावी.

सौर कृषीपंपाचा 5 वर्षाकरिता पंप आस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरविण्यात येतो त्यामुळे सदर लाभार्थींचा सौर पंप, विमा कंपनीकडून नुकसान भरपाई करीता पात्र ठरेल. विमा कंपनीकडुन नुकसानभरपाई करीता पंप आस्थापित करणारी एजन्सी सहकार्य करेल.

सौर कृषीपंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल. सदर एजन्सीकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल.

एखाद्दा अर्जदार शेतक-यास ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कायार्लयाशी संपर्क साधावा. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.